अहमदाबाद विमान अपघात | 'देव तारी त्याला कोण मारी' म्हणीचा प्रत्यय; १० मिनिटांनी वाचला जीव

गुजरातमधील अहमदाबाद येथे Air India च्या AI-171 या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना भारतात मोठ्या विमान अपघातांपैकी एक मानली जात आहे. या अपघातात एक चमत्कारिक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अहमदाबादच्या भूमि चौहान या महिला लंडनला परतीचा प्रवास करत होत्या. मात्र वाहतूक कोंडीत अडकलेल्या भूमि यांना विमानतळावर पोहोचायला १० मिनिटांचा उशीर झाला आणि त्याचमुळे त्यांना फ्लाइटमध्ये चढता आलं नाही. या घटनेबाबत भावना व्यक्त करताना भूमि म्हणाल्या, "माझं मन सुन्न झालं. मी गणपती बाप्पाची खूप आभारी आहे. १० मिनिटांच्या उशिरामुळे माझा जीव वाचला. हे अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे." भूमि चौहान दोन वर्षांनंतर भारतात आल्या होत्या. त्या लंडनच्या ब्रिस्टल शहरात आपल्या पतीसोबत राहतात. दरम्यान, या अपघातात फक्त एकच प्रवासी जिवंत सापडला आहे. विश्वशकुमार रमेश (सीट 11A) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी स्वतःच्या पायांवर चालत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. DGCA आणि संबंधित यंत्रणा अपघाताच्या कारणांचा तपास करत असून, अधिकृत निष्कर्ष लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.