धावत्या बसने घेतली अचानक पेट
.jpeg)
लखनऊ : बिहारहून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवासी बसला लखनऊमधील किसानपथ परिसरात गुरुवारी पहाटे अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, आग इतकी भयानक होती की संपूर्ण बस काही क्षणांत जळून खाक झाली. ८० प्रवाशांनी काचा फोडून स्वतःचे प्राण वाचवले, तर बसचालक आणि कंडक्टरने उडी मारून जीव वाचवला. ही बस जवळपास एक किलोमीटरपर्यंत धावत राहिली.
मृतांमध्ये २ बालकांचा समावेश
या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये:
- लक्ष्मी देवी (55) – अशोक महतो यांच्या पत्नी
- सोनी (26) – अशोक महतो यांची मुलगी
- देवराज (3) – रामलाल यांचा मुलगा
- साक्षी कुमारी (2) – रामलाल यांची मुलगी
- एक अज्ञात पुरुष – ओळख पटलेली नाही
प्रत्यक्षदर्श्यांचे सांगणे
प्रत्यक्षदर्श्यांनी सांगितले की, “बसमध्ये अचानक आग लागली. प्रवासी घाबरून आरडाओरड करू लागले. काहीजण दरवाजाकडे धावले, तर काहींनी खिडक्या फोडण्याचा प्रयत्न केला.” खिडक्यांमध्ये लोखंडी रॉड लावलेले असल्याने बाहेर पडणे कठीण झाले. रस्त्यावरील नागरिकांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाची प्रतिक्रिया:
घटनेनंतर डीसीपी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, या दुर्घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.