दिल्लीतील 98वे मराठी साहित्य संमेलन गाजले; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले – "साहित्यिकांनीही मर्यादा पाळल्या पाहिजेत"

दिल्ली : ९८ वं मराठी साहित्य संमेलन नुकतंच देशाची
राजधानी दिल्ली इथं पार पडलं. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाची यंदा बरीच चर्चा
झाली. या संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय नेत्यांविरोधात विधानं केली गेली. याची
खूपच चर्चाही झाली, यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकानं काही
मर्यादा पाळल्या पाहिजेत, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या विधानावर उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. माध्यमांच्या
प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले, "प्रत्येकानं
साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषतः साहित्यिकांना
असं वाटतं की, राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नयेत. किमान तशा
पद्धतीचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं. मग त्यांनी देखील पार्टी लाईन्सवर कमेंट
करणं योग्य नाही, त्यामुळं साहित्यिकांनी देखील मर्यादा
पाळणं गरजेचं आहे"
फडणवीसांनी का दिली प्रतिक्रिया ?
साहित्य संमेलनात पंतप्रधानांपासून ठाकरेंपर्यंत अनेकांनी
उपस्थिती लावली. पण साहित्य संमेलनात अशा प्रकारे राजकीय नेत्यांनी हजेरी लावणं
कितपत योग्य आहे? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना
विचारण्यात आला. याला उत्तर देताना प्रत्येकानं साहित्य संमेलनात बोलताना काही
मर्यादा पाळल्या पाहिजेत, असं म्हटलं आहे. यंदाच्या साहित्य
संमेलनाचे उद्घाटक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते, तर
स्वागताध्यक्ष राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हे होते. तर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आहेत. साहित्य
संमेलनाच्या उद्घाटनावेळी अध्यक्षा तारा भवाळकर यांनी अत्यंत अभ्यासूपणे मराठी
भाषेच्या जाणीवांबाबत भाषण केलं होतं. तसंच या भाषणात येणाऱ्या संदर्भानं त्यांनी
पंतप्रधनांपासून मुख्यंत्र्यांपर्यंत टी केली होती. अध्यक्षांच्या या भाषणांनंतर अनेकांनी त्यावर
सडेतोड अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यापार्श्वभूमीवर फडणवीसांनी भाष्य
केलं आहे.