रेल्वे जेवण दर्जावर ६६४५ तक्रारी! राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची धक्कादायक कबुली

नवी दिल्ली :- 
भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 6645 तक्रारी रेल्वेतील अन्नाच्या दर्जाबाबत प्राप्त झाल्या असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले आहे. खासदार जॉन ब्रिटास यांनी रेल्वेतील अन्नसेवा, त्यातील दर्जा आणि कंत्राटातील पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी विस्तृत माहिती दिली.

तक्रारींवर कारवाईचा तपशील:

  • 1341 प्रकरणांमध्ये दंड ठोठावला
  • 2995 प्रकरणांमध्ये ताकीद
  • 1547 प्रकरणांमध्ये सल्ला व सूचना
  • 762 प्रकरणांमध्ये इतर उपाययोजना

मागील वर्षींच्या तक्रारींचा आलेख:

  • 2023-24: 7026 तक्रारी
  • 2022-23: 4421 तक्रारी
  • 2021-22: 1082 तक्रारी

या आकडेवारीवरून रेल्वे प्रवाशांमध्ये अन्नाच्या गुणवत्तेबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून येते.

कंत्राट प्रक्रियेबाबत उत्तर:

जॉन ब्रिटास यांनी विचारले की, "IRCTC अनेक मार्गांवरील कंत्राटे एका गटाला दिली आहेत का?"
त्यावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले, “निविदा प्रक्रिया पारदर्शक असून, सर्वोच्च बोली लावणाऱ्याला कंत्राट मिळते. सध्या 20 विविध कंपन्यांकडे कंत्राटे आहेत, त्याची माहिती IRCTC वेबसाइटवर प्रकाशित केली जाते.”

अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी रेल्वेने उचललेली पावले:

  • बेस किचन नियुक्त: ठराविक ठिकाणीच जेवण बनवले जाते
  • CCTV यंत्रणा: किचनमधील स्वच्छतेवर लक्ष
  • ब्रँडेड कच्चा माल: दर्जेदार कच्चा माल वापरणे अनिवार्य
  • फूड सेफ्टी सुपरवायझर: प्रत्येक किचनमध्ये नियुक्त
  • आधुनिक किचन: सुसज्ज आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त किचनची उभारणी

रेल्वेमंत्र्यांनी आश्वासन दिले की, भविष्यात अन्नसेवेच्या दर्जावर विशेष भर दिला जाणार असून प्रवाशांचा विश्वास कायम राहील.