निकालाच्या नैराश्यात १६ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित दहावी परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आनंद साजरा करत असतानाच, पिंपरी चिंचवडमधील चऱ्होली

फाटा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सुप्रजा हरी बाबू (वय १६) या विद्यार्थिनीने केवळ ३९ टक्के गुण मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१३ मे) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. सुप्रजाने निकाल मोबाईलवर पाहिल्यानंतर काही वेळाने बेडरूममध्ये गेली. बराच वेळ बाहेर न आल्याने आईने दरवाजा उघडून पाहिले असता, ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तातडीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.

पालक आणि समाजासाठी इशारा ही घटना पालक, शिक्षक आणि समाजासाठी चिंतन करण्याजोगी आहे. परीक्षेतील अपयश म्हणजे जीवनाचे अपयश नाही, हे समजावून सांगणे आणि विद्यार्थ्यांशी संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.