जयपूरच्या ११ तरुणांना बनास नदीत जलसमाधी...

टोंक (राजस्थान) : मंगळवारी जयपूरच्या ११ तरुणांचा पिकनिकचा दिवस एका मोठ्या शोकांतामध्ये
बदलला. बनास नदीत स्नान करत असताना हे सर्व तरुण नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून
गेले. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून
उर्वरित ३ जणांचा अद्याप शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या
सुमारास घडली. जयपूरमधून आलेले हे ११ तरुण बनास नदीच्या जुन्या पुलाजवळ पिकनिकसाठी
आले होते. त्यांनी एकत्र नदीत आंघोळ करण्यास सुरुवात केली. मात्र, काही वेळातच वाढत्या प्रवाहामुळे सर्वजण अडकले आणि खोल पाण्यात बुडू
लागले.
घटनास्थळी उपस्थित स्थानिकांनी धोक्याची घंटा
वाजवली आणि पोलिसांना तत्काळ सूचना दिली. टोंक पोलिस, जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल
झाले आणि बचाव कार्य सुरू केले. सध्या 8तरुणांचे मृतदेह
बाहेर काढण्यात आले आहेत आणि सआदत रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी
त्यांना मृत घोषित केले. उर्वरित ३ जणांचा शोध गोताखोरांच्या मदतीने सुरू आहे. स्थानिकांनी
सांगितले की, या नदीच्या भागात कोणतीही सुरक्षा यंत्रणा,
सूचना फलक नाही. हा जुना पूल परिसर असून अनेक लोक तिथे अनभिज्ञतेने
आंघोळीसाठी जातात, त्यामुळे अशा दुर्घटना घडण्याचा धोका
असतो. या घटनेनंतर टोंक जिल्ह्यात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांसाठी
शासकीय मदतीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून या प्रकरणाची
सखोल चौकशी सुरू असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केली जाणार
असल्याचे सांगण्यात आले.