1 रेशीम दोन हजार नवीन शेतकर्‍यांना रेशीम उद्योगाकडे वळविणार रेशीम उत्पादनास प्रोत्साहनासाठी महारेशीम अभियान

सोलापूर, :- जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी खूप वाव आहे. रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणार्‍या शाश्वत उत्पन्नाची शेतकर्‍यांना माहिती व्हावी याकरिता जिल्ह्यात महारेशीम अभियान-2025 राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून कृषी विभाग, जिल्हा परिषद व इतर यंत्रणा यांच्या समन्वयाने सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सुमारे 2 हजार नवीन शेतकर्‍यांना रेशीम उद्योगाकडे वळविण्यासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 1 हजार 17 शेतकर्‍यांचा 1 हजार 260 एकरावर हा उद्योग चालू असून 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी महारेशीम नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून जिल्ह्यासाठी नव्याने 500 एकर तुती लागवडीचा लक्ष्यांक दिलेला आहे.  या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी 3 वर्षाच्या कालावधीत अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनेसाठी 682 दिवस व कीटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे 895 दिवसांची मजुरी देण्यात येते. स्वत: मजूर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे. सध्या प्रतिएकर 3 वर्षांकरिता एकूण 4 लाख 18 हजार 815 रुपये इतके अनुदान देण्यात येते. तसेच सिल्क समग्र-2 या योजने अंतर्गत एक एकर नवीन तुती लागवडीसाठी सर्वसाधारण गटाकरिता 3 लाख 75 हजार रुपये अनुदान व अनुसूचित जाती/जमातीकरिता 4 लाख 50 हजार अनुदान देण्यात येते. लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्याकडे मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. एकरी वार्षिक सर्व खर्च वजा जाता किमान 1 लाख 50 हजार रुपये उत्पन्न निश्चित मिळते. जिल्ह्यातील 2025-26 करिता रेशीम शेतीचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या शेतकर्‍यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी पवार यांनी केले आहे