सोलापूरमध्ये उष्णतेचा कहर; तापमान ४०.२°C वर, नागरिकांना आरोग्य विभागाचा इशारा
सोलापूर : राज्यात
उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यात
आज या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून पारा ४०.२° सेल्सिअस (१०४.४° फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचला आहे.
त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. आजच्या हवामान
अहवालानुसार कमाल तापमान ४०.२° सेल्सिअस (१०४.४°F) तर किमान तापमान २०.६° सेल्सिअस (६९.१°F) नोंदवण्यात आले. तसेच हवेतील आर्द्रता (RH) केवळ २४
टक्के इतकी असल्याने वातावरणात कोरडेपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुपारी १२ ते
४ या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून अनेक ठिकाणी रस्ते ओस पडताना दिसत
आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढल्याची शक्यता व्यक्त
करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
वाढत्या तापमानाचा विचार करता आरोग्य विभागाने नागरिकांना
काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
- भरपूर पाणी प्या: शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. लिंबू
सरबत, ताक
आणि नैसर्गिक पेयांचे सेवन करा.
- वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर
पडणे टाळा.
- संरक्षणात्मक उपाय: बाहेर जाताना सुती कपडे वापरा, डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधा
आणि डोळ्यांसाठी सनग्लासेस वापरा.
- डॉ. संतोष नवले , जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितले की, या हंगामातील हे पहिलेच उच्चांकी
तापमान असून पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी स्वतःची तसेच पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी.