भाजपची डोकेदुखी नितेश राणेंमुळे वाढणार?

केरळचा 'मिनी पाकिस्तान' असा उल्लेख करून राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला असला तरी स्वतःची आक्रमक हिंदुत्ववादी अशी प्रतिमा उंचाविण्यासाठी राणे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना भाजपमधून प्रतिसाद मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. उलट भाजपसाठी राणे हे डोकेदुखी ठरण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणे यांनी त्यांची प्रतिमा आक्रमक हिंदुत्ववादी अशी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. रामगिरी महाजारांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून प्रतिक्रिया उमटल्यावर नितेश राणे यांनी रामगिरी महाजारांना काही इजा झाल्यास मशिदीत घुसून मारण्याचा इशारा दिला होता. यावरून राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. राणेंचा हिंदुत्ववादी नेता प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान करतानाच राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दहशतवादी संघटनांच्या मदतीने लोकसभेत निवडून आल्याचे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले. या वक्तव्यावरून केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी राणे यांच्यावर कठोर टीका केली आहे. तर केरळमधील डाव्या पक्षाच्या खासदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नितेश राणे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनीही राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध करीत कारवाईची मागणी केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्री नितेश राणे यांची भूमिका मान्य आहे का, असा सवालही काँग्रेसने केला आहे.

केरळात भाजपला अद्यापही विस्तार करता आलेला नाही. लोकसभेत त्रिशर मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. हा अपवाद वगळता भाजपला जनाधार मिळालेला नाही. मध्यंतरी ख्रिश्चन समाजाला जवळ करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला. नितेश राणे यांच्या वक्तव्याने केरळमध्ये भाजपचे उलट नुकसानच होईल, अशी स्थानिक भाजप नेत्यांची भूमिका आहे. शिवसेना, काँग्रेस असा राजकीय प्रवास करून नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राणे यांचे पुत्र आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका मांडत असले तरी भाजपचे वरिष्ठ नेते राणे यांना फार प्रतिसाद देण्याची शक्यता नाही. कोकणात शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्या वर्चस्वाला शह देण्यात भाजपला राणे यांचा उपयोग झाला. राणे यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने त्यांचे पुत्र नितेश राणे यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.