बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट)ची नामुष्की; सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, अजित पवारांचा धक्कादायक खुलासा

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून भाजपा–जेडीयूच्या नेतृत्वाखाली एनडीएने दमदार कामगिरी केली आहे. परंतु या निवडणुकीत महाराष्ट्रातर्फे लक्ष वेधणारी बाब म्हणजे, एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी बिहारमध्ये स्वबळावर लढवलेल्या निवडणुकीतील लाजिरवाणी कामगिरी. पक्षाने उभे केलेल्या सर्व १६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून, काही उमेदवारांना तर ५०० मतांपर्यंतही पोहोचता आले नाही. या पराभवाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी दिलेले उत्तर अधिकच चर्चेत आले. ते म्हणाले— "बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका असं मी सांगितलं होतं. पण नंतर आमच्या वरिष्ठ पातळीवर प्रफुल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी महाराष्ट्रात होतो, त्यामुळे त्या निर्णयांबाबत मला अधिक माहिती नाही." या वक्तव्यामुळे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासूनच अजित पवारांना दूर ठेवण्यात आले का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादीची कामगिरी: अत्यंत खराब राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने बिहारमध्ये १६ उमेदवार उभे केले. यापैकी कोणत्याही उमेदवाराला उल्लेखनीय मते मिळाली नाहीत.

  • सासाराममध्ये आशुतोष सिंह यांना फक्त ११२ मते
  • त्याच जागेवर NOTA ला मिळाली ३७०+ मते
  • सर्व १६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा टक्का १६% पेक्षा कमी असल्यास डिपॉझिट जप्त होते. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अवस्था याच प्रकारची झाली.

NDA ची बिहारमध्ये दणदणीत कामगिरी

या निवडणुकीत बिहारने ऐतिहासिक मतदान नोंदवले. मतदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला असून भाजपा–जेडीयूच्या नेतृत्वाखालील एनडीएने २४३ पैकी जवळपास २०० जागांचा टप्पा गाठला.

  • भाजप पहिल्यांदाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष
  • जेडीयू आणि इतर सहयोगींनीही चांगली कामगिरी
  • RJD आणि महाअघाडीचे प्रदर्शन अत्यंत खराब

२०२० मध्ये नितीश कुमार भाजपसोबत होते आणि रालोआला १२२ जागांचे बहुमत मिळाले होते. काही काळ महागठबंधनात राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि या निवडणुकीत हा निर्णय त्यांच्या फायद्यात गेला.