अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाची धडक; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलींच्या डोळ्यासमोर उभा राहिला अंधार

बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुदे (वय ३०) यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला होता. कुसुम सुदे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

 घटना नेमकी कशी घडली?

२२ नोव्हेंबर रोजी अजित पवार परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी जात होते. ताफा धूनकवड फाट्याजवळून जात असताना ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीवरील चारही जण रस्त्यावर भिरकावले गेले. या अपघातात कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णू दामोदर सुदे (३५) आणि त्यांच्या दोन लहान मुली—रागिणी (९) व अक्षरा (६)—गंभीर जखमी झाले होते.

 स्थानिकांनी दाखवली तत्परता

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन सर्व जखमींना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, कुसुम सुदे यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

 दोन निष्पाप मुली आईशिवाय

या अपघातात दोन छोट्या मुलींच्या आयुष्यावर अपरिमित आघात झाला आहे. एका क्षणात त्यांची जगण्याची दिशा बदलली असून त्या दोघी आता आईविना पोरक्या झाल्या आहेत. कुटुंबीय आणि परिसर या घटनेने हतबल झाला आहे.