संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; “लोकशाही बळकट व्हावी म्हणून निवडणूक आयोगाला भेट आवश्यक”

मुंबई,  ऑक्टोबर 2025 :-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील लोकशाही बळकट ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाशी संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. राऊत यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, “निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता असली तरी लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. संजय राऊत यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी, यासाठी कोणताही संशय राहू नये ही सर्व पक्षांची भूमिका आहे. या भेटीमागे राजकीय हेतू नसून लोकशाही बळकट करण्याचा हेतू आहे.”

राऊत यांनी पुढे आवाहन केले की, “आपण स्वतः या शिष्टमंडळात सहभागी व्हावे आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी.” दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक 2026 साठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. २२७ प्रभागांपैकी १५ अनुसूचित जाती आणि २ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाले आहेत. यामुळे अनेक माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर संकट निर्माण झाले आहे. संबंधित प्रभागात नवीन उमेदवार शोधण्यासाठी सर्व पक्षांना आता धावपळ करावी लागणार आहे.