कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीने गाठली धोका पातळी; ७४ बंधारे पाण्याखाली, प्रशासन सतर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे आज (दि. २१) सकाळी पंचगंगा नदीने ४३ फूट पातळी गाठत धोका स्तर ओलांडला आहे. त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. रात्रीभर मुसळधार पावसानंतर सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असून काही भागांत सूर्यदर्शन झाले. तरीही नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम आहे. वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर काल पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आज सकाळी पाणी ओसरल्याने मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तरीही जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. ७४ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत, यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही शाळांमध्ये पाणी शिरल्याने शिक्षण विस्कळीत झाले आहे.

महत्वाच्या बंधाऱ्यांवरील पाणीपातळी (२१ ऑगस्ट सकाळी)

  • तेरवाड बंधारा – 61 फूट 10 इंच
  • शिरोळ बंधारा – 60 फूट 09 इंच
  • नृसिंहवाडी यादवपुल – 59 फूट 03 इंच
  • रुई बंधारा – 69 फूट 07 इंच
  • इचलकरंजी बंधारा – 65 फूट 07 इंच
  • सुर्वे बंधारा – 39 फूट 02 इंच
  • अंकली बंधारा – 45 फूट 09 इंच
  • राजापूर बंधारा – 48 फूट 03 इंच

प्रशासनाने दिलेला सतर्कतेचा इशारा
महामार्ग वाहतुकीस सुरुवात झाली असली तरी नदीकाठच्या गावांमध्ये आणि बंधाऱ्यांवर पूराचा धोका कायम आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.