राजापूरमध्ये भीषण अपघात – टेम्पो पलटी होऊन ७ महिला गंभीर जखमी, १ महिलेचा मृत्यू

राजापूर – रत्नागिरी जिल्ह्यातील मिठगवाणे सागरी महामार्गावर
बुधवारी (दि. १३) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला.
या घटनेत ७ महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एका महिलेचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वाघ्रण येथून जानशी
पठारावर बागकामासाठी महिला मजुरांना घेऊन टेम्पो जात असताना समोरून येणाऱ्या
लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला. टेम्पो सुमारे १०० ते १५० फूट
रस्त्याच्या कडेला पलटी होत फरफटत गेला. यात टेम्पोतील सर्व महिला, एक छोटी मुलगी तसेच चालक आणि केबिनमधील पुरुष प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर
सर्व जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर
गंभीर जखमींना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान एका
महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी
दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात
पोहोचवण्यात आले. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.